सभोवताली सारे जेव्हा भिजले होते
काही तुषार माझ्यावरही उडले होते
सचैल न्हाणे कधीच नव्हते नशिबी माझ्या
सहवासाचे थेंब जरा शिंपडले होते
जिथून झाल्या आयुष्याच्या विभक्त वाटा
पुढे पाउले गेली, मन घुटमळले होते
धूळ पाहुनी बसेल का विश्वास कुणाचा
कधी तरी हे वाळवंट मोहरले होते
बाळ-पाळणा, विवाह-वेदी, चिता चंदनी
कशास सारे? ह्याविण काही अडले होते?
अनामिकांच्या वारीमधली एक प्रवासी
रिंगण जन्माआधिच माझे ठरले होते
मना, आपले-परके तू ह्यावरून ओळख
मेले तेव्हा दु:ख एकटे रडले होते