Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

स्पर्श

  • स्पर्श ओझरता पुन्हा रोमांचित करून गेला
    वाटले होते ऋतू फुलण्याचा सरून गेला

    मस्तकाला एकदा स्वप्नी चुंबिले सख्याने
    सप्तरंगी भाकिते भाळी उमटवून गेला

    दरवळाया लागल्या श्वासांच्या लडी असाव्या
    माळलेला मोगरा केव्हाचा सुकून गेला

    पालवी फुटली अचानक वठल्या तनामनाला
    अंतरी कोणीतरी अमृत शिंपडून गेला

    थेंब रुजला स्वातिचा, घडला शिंपल्यात मोती
    चंद्र जेव्हा अंतरी अलगद विरघळून गेला

  • आधार

    ज्यास प्रेमाचे न कोंदण, तो मुळी शृंगार नाही
    ज्यास मोहाची न झालर, प्रीत पूर्णाकार नाही

    रेशमी, उत्कट मिठीने बांधुनी ठेवू कशाला ?
    कैद इच्छेवीण करण्या प्रेम कारागार नाही

    खेळुनी गेलास माझ्या भावनांशी, जीवनाशी
    अन्‌ तरी दावा तुझा, हे प्रेम, हा व्यभिचार नाही…

    दाह विरहाचा तुझ्या जाळील सर्वांगा तरीही
    दग्ध होण्याच्या भितीने ह्यापुढे अविचार नाही

    जागणे खाल्ल्या मिठाला भूषणास्पद खास अहे
    आसवांना जागते मी; सांग, अश्रू क्षार नाही ?

    दे नजर नजरेस आता, राहिला धोका न काही
    वाहुनी निवलेत डोळे, जाळण्या अंगार नाही

    आजवर मी मौन होते, हीच माझी चूक झाली
    एव्हढेही बोलण्याचा का मला अधिकार नाही ?

    मी तुझ्या दारी कशाला याचना घेऊन येऊ ?
    प्रीतिची भिक्षा नको, मी एव्हढी लाचार नाही

    रोज मातीमाय पोटी घेतसे लाखो जिवांना
    कोण म्हणतो मृण्मयीला ह्या जगी आधार नाही ?

    कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही
    कधी आषाढ-ओल्या आठवांनी नाहले नाही

    तसे लक्षात येण्यासारखे नव्हतेच हे फुलणे
    कुणी अंजारले नाही, कुणी गोंजारले नाही

    कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
    झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?

    जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
    जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही

    जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
    तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?

    वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
    कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही

    अपघात

    तुझा हात आला हाती अपघाताने
    कुणी जोडली ही नाती अपघाताने ?

    किती रुक्ष होता माझा निर्जन रस्ता
    मिळालास तू सांगाती अपघाताने

    सुन्या मैफिलीचा झाला प्रीतीजलसा
    उजळताच नयनी वाती अपघाताने

    कुणी नाव का चंद्राचे घेतो आहे ?
    उजळल्या तमोमय राती अपघाताने

    कसे शब्द साधे माझे मोती झाले
    असावी शिरावर स्वाती अपघाताने

    अशा, मृण्मयी, आल्या वळवाच्या धारा
    भिजे चिंब न्हाती माती अपघाताने

    नांदी

    चंद्र पुनवेचा, असावी तीट वर काळ्या ढगाची
    भूषवी डोळ्यास जैसी गर्द महिरप काजळाची

    सागराच्या सोबतीने सोड, नौके, तू किनारा
    उसळत्या लाटात त्याच्या धुंद नांदी वादळाची

    सोसवे ना दाह विरहाचा, सख्या, येशील केव्हा ?
    हा न गात्रांचा पुकारा, ही विनवणी काळजाची

    तप्त केले, उजळले सर्वांग ज्याने कांचनासम
    त्या तुझ्या स्पर्शास केवळ एक उपमा – पारसाची!

    बोलला पाऊस पहिला मृण्मयीला चुंबताना
    वर्षभर वेडावते मज आठवण मृद्-सौरभाची

    तहान

    भरून सागर त्यांचे सरिता तहानलेली
    तृषा मिटे रसिकांची, कविता तहानलेली

    न शांभवी ही, विरही डोळ्यांमधील अश्रू
    कळे न सुरई कोणाकरिता तहानलेली

    शुकाप्रमाणे विन्मुख मोहांस राहिल्याने
    उरेल नीरस, कडवट शुचिता तहानलेली

    फिरून झाल्या विहिरी परक्या घरांतल्याही
    तरी न शमला अग्नी, पतिता तहानलेली

    जिथे तिथे लुचणाऱ्या पाहून पाडसांना
    भिजूनही वांझोटी धरिता तहानलेली…

    कातरवेळी

    हळूच ये स्वप्नी माझ्या कधीतरी कातरवेळी
    तुझ्या वियोगाच्या उठती कळा उरी कातरवेळी

    नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडी
    कशी प्रवेशू ओलेती पतीघरी कातरवेळी

    नकोस तू पावा छेडू घरापुढे सायंकाळी
    थरारते देहामधली निशाचरी कातरवेळी

    कधी कटीशी झोंबे ती, कधी दिसे बाहूपाशी
    अधर तुझे चुंबी वेणू निलाजरी कातरवेळी

    असे उंबऱ्याचे कुंपण, करात या हिरव्या बेड्या
    तरी जारकर्माच्या मी शिवेवरी कातरवेळी

    कळे तुझ्या छळण्यामधली अवीट मज गोडी तेव्हा
    छळे तुझे नसणे जेव्हा परोपरी कातरवेळी

    तृषार्त माती गंधाळे, बने मृण्मयी मृद्गंधा
    (पडूनिया गेल्या गाली पुन्हा सरी कातरवेळी…)

    शृंगार

    संपत आला प्रवास माझा, नावाड्या ने पार मला
    खूप उन्हाची वाट चालले, दे माझा अंधार मला
    फुकट आणसी, मोफत नेसी, दाम मागसी जगण्याचे
    खिसे रिकमे करून जायचा कळला ना व्यवहार मला
    पार्थिवतेचे तोडून बंधन उत्कटतेने मिठीत घे
    जिवाशिवाची भेट घडू दे, देह जाहला भार मला
    मनोमनी मी तुलाच वरले, नेई कृतान्ता हरुन मला
    जगण्याशी हा संग रोजचा भासतसे व्यभिचार मला
    हरेक जन्मी एकदाच का होते अपुली भेट सख्या ?
    याही जन्मी आसुसले मी, ये मृत्यो, स्वीकार मला
    किती मृण्मयीने सजवावे मातीला ह्या तुजसाठी ?
    दोन घडी तुज रिझवायाला किती जन्म शृंगार मला ?

    झपाटलेले कभिन्न आभाळ सांजवेळी
    तशात होत्या पिशाचलेल्या दिशा दहाही
    उरास बडवीत गडगडे ढग जराजर्जरा
    कडाडणाऱ्या विजेस धरणी थिजून पाही
    करीत सर्वेश्वरापरी थेंब थेंब तांडव
    समीप विध्वंस ठाकल्याची नृशंस ग्वाही
    समुद्रपृष्ठी छड्या उमटतात पावसाच्या
    करीत लाटा किनारपट्टीवरी चढाई
    कवेत घेई वसुंधरेला अधीर वादळ
    फिरून माती निमूट त्याचा प्रमाद साही
    फिरून आला ऋतू धरेच्या समर्पणाचा
    पतिव्रतेचा टिळा कपाळी उगाच नाही

    संभ्रम

    ओढ क्षितिजाची मनाला आवरेना
    लक्ष्मणाची मात्र रेषा लंघवेना

    साद येते स्पष्ट ती कानी तुझी पण
    मीलनाचा मार्ग काही सापडेना

    साथ देण्या मी जरी येऊ पाहते
    संभ्रमाला साथ माझी सोडवेना

    भेटता तू बोलते मी अन्य सारे
    नेमके बोलायचे ते बोलवेना

    सांज सोनेरी तुझ्यासमवेत जाते
    एकटीने काजळ्या रात्री सरेना

    मेघ आषाढातला झाले जणू मी
    राजसा, डोळ्यातले पाणी खळेना

    बंदराला नाव पोहोचेल कैसी
    वादळांचे मैत्र जीवा मोडवेना

    चांदण्यांनो घ्या जरा तुमच्यात मजला
    रोहिणीला मोह चंद्राचा चुकेना

    जरा जुन्या पोस्ट्स »